ऐन पावसाळ्यात खारेपाटात पाणीप्रश्न कायम, वीजपुरवठाही वारंवार खंडीत!
वाशी विभागाला वर्षानुवर्षे पाणीटंचाईचे ग्रहण
पेण/वाशी (योगेश मढवी) : ऐन पावसाळ्याच्या दिवसांत कोरोनासारखी महामारी, साथीचे आजार, चालू असलेले लॉकडाऊन, शेतीची कामे या सर्व समस्यांमुळे वाशी-वडखळ विभाग खारेपाटातील शेतकरी चिंतेत असताना पिण्याचे पाणी दर २ दिवस आड ते पण कधी आले तर चांगले नाही तर गढूळ, मातीमिश्रीत येणारे पाणी आणि एकीकडे पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न चालू असताना सातत्याने जाणारी लाईट हा दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे वाशी विभागाला वर्षानुवर्षे पाणीटंचाईचे ग्रहण लागलेले असून हा प्रश्न अद्यापही कायम असल्याने या परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या दोन्ही प्रश्नांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलले असता असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे मिळतात. या पाणी आणि लाईट समस्येमुळे खारेपाटातील जनता पुरती हैराण झालेली आहे. तरी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या समस्यांवर लक्ष घालून या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन खारेपाटातील जनता करू लागली आहे.
