दक्षिण रायगडात माणगांव येथे जात प्रमाणपत्र पडताळणीचे कार्यालय व्हावे - जनतेची मागणी
माणगांव (राजन पाटील) : प्रामुख्याने समाजात नेतृत्व करण्याच्या हेतूने विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला संवर्ग सिद्ध करणे, इ.१०/१२ वी नंतर विविध ज्ञान शाखा, पदवी पदव्युत्तर शिक्षण-प्रशिक्षण, मेडिकल-अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आरक्षण सिद्ध करण्यासाठी स्वतः ची जात प्रमाणपत्र पडताळणी करावी लागते. याकरिता रायगड जिल्ह्यासाठी गोंधळपाडा-अलिबाग येथे महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात जाऊन जात प्रमाण पत्र पडताळणी करावी लागते. शासन व प्रशासनाकडून जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्र, प्रतिज्ञापत्र यांचे निर्देश असले तरी तेथील कर्मचारी वर्गाकडून होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गदर्शनाने दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धनहून ७० ते ८० कि.मी. प्रवास करून आलेले विद्यार्थी व पालक गोंधळपाड्यात गोंधळून जातात.
संगणकीय आंतरजालावर सादर केलेल्या माहितीमध्ये अथवा तांत्रिक दोषामुळे एकसूत्रता नसली तर दक्षिण रायगडातील विद्यार्थ्यांना नाहक फेरफटका मारण्यात प्रचंड त्रास होतो. यासाठी पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, माणगाव, सुधागड या तालुक्यांसाठी माणगांव तालुका येथे जर जिल्ह्याचे विभागीय कार्यालय सूरू केले तर संबंधित विद्यार्थी व पालकांचा वेळ, श्रम, पैसा व मनस्ताप कमी होईल. अशी दक्षिण रायगडातील जनतेची मागणी आहे. तसेच एकदा एखाद्या पालकाची व त्याच्या मोठ्या पाल्याची जात प्रमाणपत्र पडताळणी झाली असल्यास संबंधित पाल्याच्या जातप्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी जास्त पुराव्यांची गरज ठेवणे ही अडवणूक केल्यासारखं आहे ही बाब सुद्धा शासनाने व प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे.

Comments
Post a Comment