'रयतेचे स्वराज्य' संघटनेचा स्तुत्य उपक्रम, वडघर हायस्कूलच्या परिसराची केली स्वच्छता
माणगांव (राजन पाटील) : आजच्या युगात तरूणाई भरकटली आहे अशी सर्वसाधारण समज आज समाजात आहे. मात्र याला छेद देत ना जात, ना धर्म, ना राजकारण, ना राजकीय पक्ष, रयतेचा विकास हेच स्वप्न! हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या 'रयतेचे स्वराज्य' या संघटनेच्या शिलिम परिसरातील आजी-माजी विद्यार्थी व सदस्यांनी सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे, ता. माणगाव या शाळेत येऊन शाळा परिसराची स्वच्छता करून एक स्तुत्य उपक्रम राबवून नवीन आदर्श निर्माण केला आहे. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची स्वच्छता करणे हे आपले कर्तव्य आहे हे लक्षात घेऊन आपण हा उपक्रम आनंदाने करत असल्याचे या संघटनेचे शिलीम विभाग प्रमुख अक्षय खेडेकर यांनी सांगितले.
या अगोदर या संघटनेने रायगडाची स्वच्छता, गावातील प्राथमिक शाळा, बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध गावांची स्वच्छता केली आहे. या संघटनेत शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सदस्य लाभल्याने ही संघटना अनेक नवनवीन शैक्षणिक व सामाजिक उन्नती साधणारे उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
या वडघर हायस्कूलची स्वच्छता करण्यासाठी अक्षय खेडेकर, संतोष कासरेकर, राजेश महाडीक, कमलेश घोले, विराज धुमाळ, कल्याणी घोले, मिनाक्षी धुमाळ, कार्तिकी महाडीक, श्रुती तटकरे, विनोद जाधव, वेद जाधव यांनी कष्ट घेतले. त्याचबरोबर ही शाळा आम्हाला असे उपक्रम घेण्यासाठी जेव्हा-जेव्हा बोलवेल तेव्हा-तेव्हा आम्ही येऊ असे अभिवचन सर्वांनी दिले.


Comments
Post a Comment