कालव्याची पाण्याची पातळी कमी करावी : कोलाड परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
वरसगाव (राहुल शिंदे) : रोहा तालुक्यातील कोलाड परिसरात कुंडलिका नदीवर असणाऱ्या डोळवहाल धरणाच्या सहाय्याने काढण्यात आलेल्या कालव्यावर चिंचवली, तिसे, घोटवळ, तळवली महादेव वाडी, वरसगाव, बाईतवाडी, कोलाड या मोठ्या प्रमाणात परिसरात भातशेती केली जाते.
मात्र आता भातशेती पूर्णपणे तयार झाली आहे. या परिसरात जोरदार कापणी सुरु आहे. मात्र शेतामध्ये पाणी असल्यामुळे भातशेती कापणी करताना खूप अडचणी येत असून कापणी केल्यावर पाणी असल्याने शेतातून कापलेले भात बाहेर काढावे लागत आहे. कापणी साठी खूप वेळ ही लागत आहे. त्यामध्ये मजूरही मिळत नाही. भातशेती करणे शेतकऱ्यास परवडत नाही तरीही या परिसरातील शेतकरी शेती करीत आहेत.
दरवर्षी पाटबंधारे विभाग भातकापणीच्या वेळी कालव्या च्या पाण्याची पातळी कमी करतात मात्र या वेळी पाण्याची पातळी कमी केली नाही पाटबंधारे विभागाचे अधिकारी पुढाऱ्यांच्या पत्राची तर वाट पाहत नाही ना? अशी चर्चा सुरु असून या कालव्याचे पाणी माणगांवपर्यंत जात असून माणगांवमध्ये अनेक बिल्डरांचे इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु असून या बांधकाम व्यवसायकांसाठी कालव्याच्या पाण्याची पातळी कमी केली नसल्याची चर्चा सुरु आहे. कारण पाण्याची पातळी कमी केली की माणगांवपर्यंत पाणी पोहचत नाही असे बोलले जात आहे मात्र बिल्डरांच्या हितासाठी जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा विडा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उचलला नाही ना? असे शेतकरी वर्गात तर्क वितर्क वर्तविले जात आहेत.
मात्र शेतकरी वर्गाचा विचार करून पाटबंधारे विभागाने काल व्याच्या पाण्याची पातळी कमी करावी अशी मागणी कोलाड परिसरातील शेतकरी करीत आहेत.

Comments
Post a Comment